ही पोस्ट मुद्दामच एक दिवस उशिराने टाकली आहे. कालच ( १४ मे) झालेल्या "मदर्स डे" ला खूप जणांचे लेख वाचले, स्टेटस बघितले. आपण कितीही मोठे झालो तरी ही ज्यांच्या अवती भोवती असताना, आपण आपले वय विसरतो ते आपले आई - बाबा.
बहात्तर वर्षाची आई जेव्हा "बस, मस्त आलं घालून चहा करते" असं म्हणते, तेव्हा एक मन म्हणतं आई ला नको सांगू, तूच कर की चहा. तेव्हाच दुसरं मन सांगतं, आई दे तुझ्याच हातचा चहा! ह्या संदर्भात, गेल्या अनेक वर्षात व्यक्ती बदलली आहे, पण नातं तेच आहे. ए आई असो किंवा अहो आई असो; मला चहा करावाच लागत नाही.
मग मनात विचार आला, आईचीच मुलाखत घेतली तर... चहा पिता पिता...
आई गं, तुला तू लहानपणची लक्ख आठवते की मी?
मीच मला जास्त आठवते. कारण तू आईकडे होतीस ती १२ वर्ष कमी आठवतेस.
तुझ्या लहानपणची एखादी चांगली आठवण जी तुझ्या मनात अजून घर करून आहे...
मला आठवणारी पहिली चांगली आठवण...
माझं सातवीपर्यंतचं शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेत झालं. त्याकाळी महानगरपालिका सातवीपर्यंतच शिक्षण द्यायची. आठवी ते अकरावीसाठी खाजगी शाळेत जावं लागायचं. ६६ साली सातवीत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता व त्यात नंबर आला म्हणून पुढे आंतर् शालेय वक्तृत्व स्पर्धेत मला शाळेने धाडलं. त्याचा निकाल मला कळलाच नाही. आठवीत मी दहिसरातल्या आजच्या सुप्रसिद्ध विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतला.आठवीत असताना एकदा महानगरपालिकेच्या शाळेतून मला 'शाळेत येऊन हेडमास्तरांना भेट' असा निरोप आला. माझी एकदम घाबरगुंडी उडाली. काय झालं आपल्या हातून काही समजेना. हेडमास्तरांना भेटले तेव्हा पाय अक्षरशः लटपटत होते, छातीत धडधडत होतं, घशाला कोरड पडली होती. आश्चर्य हे की हेडमास्तरांनी मला (वट्ट) ७ रुपये दिले आणि म्हणाले त्या आंतर् शालेय वक्तृत्व स्पर्धेत तुझा तिसरा नंबर आलाय..बक्षीसादाखल हे पैसे महानगरपालिकेने पाठवले आहेत. क्षणात भितीचं रुपांतर आनंदात झालं. हेडमास्तरांनी माझी पैसे मिळाल्याची सही घेतली. ते माझं आयुष्यातलं पहिलं बक्षीस. मग हेडमास्तरांनी विचारलं ह्या पैशांचं काय करणार....वाचनाची आवड असल्याने मी ताबडतोब सांगितलं...पुस्तकं घेणार. सात रुपयांत पुस्तक येतं की नाही हेही मला माहित नव्हतं, कळत नव्हतं. ते पैसे मी आईलाच दिले.
वाचनाची आवड असल्याने तेव्हा मी दौलत, हत्या वगैरे पुस्तके वाचनालयातून आणून वाचली होती. त्यामुळे मला पुस्तकं आणण्याचं पटकन सुचलं.
ही घटना मला अजून आठवते आणि मग 'पुस्तकं घेणार' हे माझं बाणेदार उत्तर ऐकून समाधानाने हसलेले आमचे हेडमास्तर आठवतात.
तुला लहानपणीची तुझ्या अवती भोवतीची परिस्थिती आणि सद्यपरिस्थिती ह्यात काय फरक जाणवतो
लहानपणी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय घराजवळच होते. तिथून पुस्तकं आणून मी वाचत असे. नातेवाईकांकडे गेलं की त्यांच्याकडची पुस्तकं मी वाचत बसत असे. चण्यादाण्यांबरोबर, वाणसामानाबरोबर, इस्त्रीच्या कपड्यांबरोबर आलेले कागद मी वाचत असे. वाचन असेल तर व्याकरण आपोआप आत्मसात होतं. नंतरच्या काळात मुलांचा अभ्यास खूपच वाढल्यामुळे त्यांना अवांतर वाचन करायला वेळच मिळत नाही. ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे.
